Dalai Lama : दलाई लामांच्या जीवाला धोका? गुप्तचर खात्याच्या अहवालानंतर केंद्राने सुरक्षा वाढवली

नवी दिल्ली : बौद्ध धर्मगुरू दलाई लामांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यांना आता झेड श्रेणीतील सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. गुप्तचर खात्याने या संदर्भात एक अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला आणि त्यानंतर दलाई लामांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दलाई लामांच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये एकूण 33 सुरक्षा कर्मचारी असतील. त्यामध्ये 12 कमांडो आणि 6 पीएसओ आहेत, जे त्यांना 24 तास सुरक्षा पुरवतील. सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये 10 सशस्त्र स्थिर रक्षकांचा समावेश असेल, जे त्यांच्या निवासस्थानी उपस्थित असतील.
गुप्तचर अहवालात धमकीचा उल्लेख
दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित ड्रायव्हर आणि पाळत ठेवणारे कर्मचारी सदैव कर्तव्यावर असतील. तसेच 12 कमांडो जे त्यांना तीन शिफ्टमध्ये सुरक्षा पुरवतील. चीनविरुद्धच्या अयशस्वी बंडानंतर दलाई लामा तिबेटहून 1959 मध्ये भारतात आले. गेल्या अनेक वर्षांमध्ये, गुप्तचर अहवालांनी दलाई लामा यांच्या जीवाला चीन-समर्थित घटकांसह विविध घटकांकडून संभाव्य धोके सूचित केले आहेत. त्यामुळे त्यांची सुरक्षा ही भारतासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे.
सध्याचे दलाई लामा हे तिबेटचे 14 वे दलाई लामा म्हणून ओळखले जातात. तिबेटींना न्याय मिळवून देण्याबाबत ते वर्षानुवर्षे आवाज उठवत आहेत. 1989 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल पारितोषिक देण्यात आले. तिबेटी धर्मगुरूंनी सहा खंडांतील 67 हून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत.
जागतिक नेत्यांचा पाठिंबा
तिबेटी बौद्ध धर्माचे निर्वासित आध्यात्मिक नेते दलाई लामा जुलैमध्ये 90 वर्षांचे होणार आहेत. मात्र, त्यांनी मृत्यूपूर्वी तिबेटला परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दलाई लामा यांना त्यांच्या लढ्यामध्ये अनेक जागतिक नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. 2010 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी चीनच्या विरोधाला न जुमानता दलाई लामा यांची भेट घेतली होती.